व्यक्तींचिंतन
नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. त्यांना भेटलेल्या, सहवास लाभलेल्यांचे व्यक्तिचित्रणे "निवडक नरहर कुरुंदकर खंड एक व्यक्तिवेध" मध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही उतारे व सहसंबंध (correlations )
हैद्राबाद संस्थानांमधील पहिल्या १९५२ च्या निवणुकीतील निरीक्षणं.
"नेतेमंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत. .भव्यता, दिव्यता हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे उगीच गृहीत धरून चाललो होतो. त्या व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत. हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले"
आचार्य कुरुंदकरांचे वरील अनुभव, सामवेदी ब्राहमण संघ प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीशी (correlate) जोडून बघा. अनुभव फारसा वेगळा नाही.
आदरणीय यदुनाथ थत्ते विषयी लिहिताना कुरुंदकर म्हणतात.
"यदुनाथांनीच असं म्हटलं आहे की संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की ध्येयवाद जतन करण्यासाठी संस्थांचे आस्तित्व धोक्यात घालावे लागते अश्या निर्णयप्रसंगी ध्येयवादाशी तडजोड करून संस्था टिकविण्याचे कामच जे पत्करतात त्यांनी पराक्रमावर हक्क सांगू नये"
आपल्या संस्थेचे ध्येय काय आहे? ते कसे साध्य करणार या विषयी काही चर्चा ऐकली का हो या निवड प्रक्रियेत. तडजोडी विषयी खूप काही ऐकलं असेल. अध्यक्षपद मला काम तुम्हाला. असंही कानी पडलं.
"अतिशय निर्मळ आणि स्वच्छ अशी वैचारिक भूमिका हे यदुनाथांचे कायमचे वैशिष्ट. कोणत्याही आंधळ्या व्यक्तिपूजेचे स्तोम त्यांच्याजवळ नाही. वैचारिक भूमिका स्पष्ट यामुळे व्यक्तीविषयी निष्कारण अनादर दाखविण्याची प्रवृत्ती नाही. व्यक्तीच्या प्रेमापोटी येणारा आंधळेपणा अगर आकसापोटी येणारा आंधळेपणा हे दोन्ही आंधळेपणा टाळून विचारांविषयी स्पष्ट पण व्यक्तीच्या विषयी सुजाण अशी भूमिका घेता येते."
अशी स्पष्टता असली की ह्याचं नेतृत्व मिळणे म्हणजे भाग्य अश्या गोष्टी येत नाही. निर्भय पणे कार्याचं मूल्यमापन करता येते. श्रेय देता येतेच परंतु राहून गेलेल्या गोष्टी सांगता येतात.
विद्यागुरु भालचंद्र कहाळेकर यांचे विचार सांगताना म्हणतात.
"लोकांना विचार कसा करावा हे शिकवा. विचार कसा करावा हे त्यांना जमले, तर सत्यापर्यंत आपला प्रवास तेच करतील. मते लादण्याची घाई नाही. जीवनाची संपूर्ण गुंतागुंत ध्यानी घ्या.
विचार करायला जमलं की खरं खोटं , मोह,माया , स्वार्थ , सारासार , विवेक हळूहळू आपल्याला कळायला लागतं तेवढी उसंत स्वतःला आणि इतरांनाही द्यायला हवी.
.
Comments
Post a Comment